अहेरी येथे पुलवामा शहीद स्मृतिदिनानिमित्त केंद्रीय राखीव पोलीस दलच्या ९ व्या बटालियनतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

47

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

अहेरी, ता. १४:— केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) च्या ९ व्या बटालियनतर्फे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतिदिनानिमित्त अहेरी येथील प्राणहिता कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली समारंभाचे आयोजन करण्यात आले.

पुलवामा येथे देशसेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर शूर सैनिकांना आदर आणि कृतज्ञतेने अभिवादन करण्यात आले. शहीद स्मृतिस्थळावर पूर्ण लष्करी सन्मान व पारंपरिक शिष्टाचारांनुसार पुष्पहार अर्पण करण्यात आले.

९ व्या बटालियनचे कमांडंट श्री शंभू कुमार यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व जवानांनी शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी शोकचिन्ह धारण करून दोन मिनिटे मौन पाळले. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांच्या अदम्य धैर्य, अतुलनीय शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्यात आले.

समारंभ अत्यंत शिस्तबद्ध, गंभीर व भावनिक वातावरणात पार पडला. दलातील प्रत्येक सदस्याच्या मनातील शहीदांविषयीचा आदर आणि संवेदनशीलता या कार्यक्रमातून प्रकर्षाने दिसून आली.

या प्रसंगी कमांडंट श्री शंभू कुमार यांनी आपल्या भाषणात सांगितले की पुलवामा येथील शहीदांचे बलिदान देशवासीयांना आणि दलातील प्रत्येक सदस्याला राष्ट्रसेवेसाठी सदैव प्रेरणा देत राहील. शहीदांचा गौरवशाली वारसा जपत देशाच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेच्या रक्षणासाठी पूर्ण निष्ठा, समर्पण आणि धैर्याने कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ९ व्या बटालियनने राष्ट्राच्या सुरक्षेबाबत आपली अटल बांधिलकी पुन्हा व्यक्त करत शहीदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असा दृढ संकल्प व्यक्त केला.