ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २६ : राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी मागील तीन वर्षापासून स्वतःकडे घेतली असली तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील जनतेच्या समस्या कमी होण्याऐवजी अधिक वाढत चालल्या आहेत. शिवाय विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी आपल्या वातानुकूलित कक्षात बसूनच प्रशासनाचा गाडा हाकत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना ‘साहेब हेलिकाॅप्टर घ्या, पण गावात या’ म्हणत प्लास्टिकचे खेळण्यातले हेलिकाॅप्टर भेट देत काॅंग्रेसने २६ जून रोजी अनोखे आंदोलन केले. सध्या या आंदोलनाची सर्वत्र चर्चा आहे.
वादळ वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन अजूनपर्यंत आर्थिक मदत मिळाली नाही, रानटी हत्तींचा उपद्रव आहे त्यांचा अजून बंदोबस्त करण्यात आलेला नाही, सुरजागड खदानीतील अवजड वाहतुकीमुळे होणारे अपघात, रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि त्यामुळे माॅन्सूनपूर्व जिल्ह्यातील रस्ते बंद करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आली आहे, यामुळे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत, शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाने मोठा गाजावाजा करून शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत तर केले मात्र त्याच शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता चांगल्या सुरक्षित बसेस नाहीत अनेक बसांची दैनिय अवस्था झाली आहे, शेतकरी नागरिकांना छोट्या मोठ्या समस्यांना घेऊन प्रशासकीय कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. मात्र त्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, अनेक कंत्राटदारांची शासकीय कामांची देयके थकीत आहेत,

पावसाळा सुरू झाला असून अजूनही बऱ्याच घरकुलधारकांना वाळू मिळाली नाही. त्यांची देयके थकीत आहेत, मनरेगाचे पैसे अजून प्रलंबित आहेत, ग्रामीण भागातील विद्युत वारंवार खंडित होत आहे, जिल्ह्यातील बेरोजगार तरुण अजूनही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत, जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पाकरिता शेतकऱ्यांशी कुठल्या प्रकारची चर्चा न करता सरसकट जमिनी अधिग्रहीत करण्याचा धोरण शासनाने अवलंबिला आहे, अशा अनेक समस्या जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष येऊन जनतेची दुःखं समजून घ्यावी, ही अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने गडचिरोलीत येणे आणि लगेचच नागपूरला परत जाणे, हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची दिसत आहे, इतकेच नाही तर जिल्ह्यातील प्रमुख पदावर बसलेल्या प्रशासकीय प्रमुख अधिकाऱ्यांची देखील हीच स्थिती व मानसिकता आहे. सर्वसामान्य जनतेला भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही, सर्वसामान्य नागरिकांनी भेटीसाठी त्यांच्या दालनात गेल्यास साहेब व्हीसीमध्ये किंवा बैठकीत व्यस्त आहे असे सांगून संबंधित नागरिकास परत पाठविले जाते. फक्त वातानुकूलित खोलीत बसून जिल्ह्यातील शेतकरी, महिला, बेरोजगार तरुण यांच्याकरिता निर्णय घेतले जातात. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या समस्या कोणीही ऐकून घेत नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह प्रमुख पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी गाव किंवा किमान तालुकास्तरावर तरी यावे या मागणीला घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात “हेलिकॉप्टर घ्या; पण गाव/ तालुक्यात या, साहेब!” या घोषणेसह एक अनोखे आंदोलन करण्यात आले व विविध कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरची प्रतिकृती आणि निवेदन देण्यात आले. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड, ओबीसी सेल अध्यक्ष भूपेश कोलते, परिवहन सेल अध्यक्ष टिकले, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसागडे, शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, विनोद लेनगुरे, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, घनश्याम वाढई, रमेश चौधरी,अनिल कोठारे, दिलीप घोडाम, भैय्याजी मुद्दमवार, नंदू नरोटे, गुलाब मडावी, हरबाजी मोरे, लालाजी सातपुते, चंद्रशेखर धकाते, महेश जकावार, वेंकटस्वामी जकावार, प्रभाकर कुबडे, जितेंद्र मुनघाटे, विजय सुपारे, शालिक पत्रे, श्रीनिवास ताटपल्लीवार, कुलदीप इंदूरकर, काशिनाथ भडके, उत्तम ठाकरे, चारू पोहने, संदीप भैसारे, हेमंत मोहितकर, राकेश रत्नावार, देवेंद्र ब्राह्मणवाडे, उमेश आखाडे, मनोज ढोरे, स्वप्नील तडाम, स्वप्नील बेहरे, दीपक चौधरी, आशा मेश्राम, अपर्णा खेवले, रीता गोवर्धन, शालिनी पेंदाम, कविता उराडे, सिद्धार्थ शेंडे, दीपक चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी, महिला, युवक यावेळी उपस्थित होते.
———————————










