Home मराठी रानटी हत्तीने ग्रामस्थाला पायाने चिरडले

रानटी हत्तीने ग्रामस्थाला पायाने चिरडले

118

गडचिरोली, ता. २५ : महाराष्ट्र राज्या लगतच्या तेलंगणा राज्यात जाऊन दोन बळी घेऊन पुन्हा महाराष्ट्रात दाखल झालेल्या सुळेवाल्या नर हत्तीने आता येथे २५ एप्रिल रोजी तिसरा बळी घेतला आहे.

तेलंगणातून परतल्यानंतर सिरोंचा वनविभागातील रेपनपल्ली वनपरीक्षेत्रात १८ दिवस मुक्काम ठोकून भामरागड वनविभागात नुकत्याच दाखल झालेल्या या रानटी हत्तीने मंगळवार २५ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता गोंगलू रामा तेलामी (वय ५३) रा. कियर ता. भामरागड या ग्रामस्थाला पायाखाली तुडवून त्याचा जीव घेतला. मंगळवार (ता. २३)रात्रीच्या सुमारास रानटी हत्तीने चिरेपल्ली (कोत्तागुडम) येथील परशुराम सोयाम यांच्या घराचे नुकसान करत ताडगूडा गावातदेखील धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पेरमिली वनपरिक्षेत्रातील आरेंदा मार्गे कोरेली गावात रात्रीच्या सुमारास शेतातील घराचे नुकसान केले. शेतशिवरात या रानटी हत्तीच्या आगमनामुळे शेतकरी भयभीत होऊन पळून गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. हा हत्ती गुरुवार (ता. २५)सकाळच्या सुमारास भामरागड तालुक्यातील कियरच्या जंगलात मुक्तसंचार करताना दिसून आला. सिरोंचा वनविभागाअंतर्गत येत असलेल्या रेपनपल्ली वनपरिक्षेत्रातील बल्लाळम जंगलात शांतपणे तब्बल १८ दिवस मुक्काम ठोकलेल्या या रानटी हत्तीने आलापल्ली वनविभागतील पेरमिली वनपरिक्षेत्रातून प्रवास करत थेट भामरागड वनविभागात प्रवेश केला आहे. मात्र, या प्रवासात त्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान केले आहे. तर कियर येथील गोंगलु रामा तेलामी या ग्रामस्थाला पायाखाली तुडवून ठार केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ३ व ४ एप्रिल रोजी तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांचा बळी घेऊन रानटी हत्तीने प्राणहिता नदी ओलांडून रेपनपल्ली वनपरिक्षेत्रात प्रवेश केला होता. तब्बल १८ दिवस याच परिक्षेत्रात मुक्काम ठोकून गुरुवारी भामरागड वनविभागातील गट्टा परिक्षेत्र हद्दीत येत असलेल्या खंड क्रमांक ५२८ मध्ये या रानटी हत्तीने गोंगलू तेलामी यांचा बळी घेतला. घटनास्थळी गट्टाचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर आणि त्यांची चमू दाखल झाली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या रानटी हत्तीच्या धुमाकुळाने येथील नागरिक भयग्रस्त झाले आहेत.